

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये ३ वर्षांची दिरंगाई झाली आहे. यामुळे कंत्राटदारास केवळ २० लाख ८८ हजारांचा दंड करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात कोणतीही वाढ झाली नसली तरी या प्रकल्पाची नवीन डेडलाईन ३१ मार्च २०२५ देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे-भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला १ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. कंत्राटदाराने या प्रकल्पाचे काम १ मार्च २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्पात दिरंगाई झाल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यास नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदारास ३१ मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करावे लागणार आहे.
या प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा ८९८.१९ कोटी इतका आहे. सध्या तरी या प्रकल्पात वाढीव खर्च झालेला नाही. मात्र प्रकल्पास ३ वर्षांची दिरंगाई झाल्याने कंत्राटदारास केवळ २०.८८ लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.
मेट्रो ५ महत्त्वाचा मार्ग असून सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग-४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-१२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उपयुक्त ठरणार आहे.