ठाणे जिल्हात ४४ टक्के पीक कर्ज वितरीत,बॅंकांनी शिबीर आयोजीत करण्याचे निर्देश

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना आहेत
ठाणे जिल्हात ४४ टक्के पीक कर्ज वितरीत,बॅंकांनी शिबीर आयोजीत करण्याचे निर्देश

जिल्हास्तरीय आढावा समितीची मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार संजय केळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक जे. एन. भारती आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत सुमारे ४४ टक्के पीक कर्ज वितरीत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पीक कर्ज वाटपासाठी बॅंकांनी शिबीर आयोजीत करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना आहेत,त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बॅंकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार केळकर यांनी केले. बॅंकांच्या शाखा ज्या भागात आहेत तेथील विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असे केळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत पुरेशा पावसाअभावी पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे चांगला पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होईल, त्यासाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज तातडीने वितरीत करण्यात यावे. आता पर्यंत केवळ ४४ टक्के पीक कर्ज वितरीत झाले आहेत. त्याला गती आली पाहिजे. त्यासाठी शिबीरे आयोजित करून कर्ज वाटप प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिले.

सामाजिक सुरक्षा योजनेविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत त्यासाठी प्राप्त कर्ज प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून कर्ज वितरण प्रक्रिया गतिमान करावी. प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, असे नार्वेकर यांनी सांगितले.

यावेळी विविध योजनांसाठीच्या कर्ज पुरवठ्याविषयी आढावा घेण्यात आला. भारती यांनी यावेळी प्रास्ताविक केले. बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील विविध बॅंकांचे विभागीय समन्वयक आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in