दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन

दिव्याच्या समस्यांविषयी चर्चा करून इतरही कल्याण-डोंबिवलीच्या समस्यांबाबत निवेदन दिले.
दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन

ठाणे : मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव यांनी रविवारी मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाला भेट दिली असता संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर व सहकाऱ्यांनी भेट घेऊन व्यवस्थापकांना सोळा हजार रेल्वे प्रवाशांच्या सह्यांच्या निवेदनावर चर्चा करून दिव्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. प्रसंगी विजय भोईर संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिवा ते सीएसएमटी लोकल चालू होणे अत्यंत गरजेचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

दिव्यात आरक्षण केंद्र आणि कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे तसेच सकाळच्या वेळी कल्याणहून सुटणाऱ्या जलद गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा ही मागणी देखील केली. आपल्या मागण्यांना समर्थन देण्यासाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे याही उपस्थित होत्या. त्यांनी देखील आपल्या दिव्याच्या समस्यांविषयी चर्चा करून इतरही कल्याण-डोंबिवलीच्या समस्यांबाबत निवेदन दिले.

यात प्रामुख्याने सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेत दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी दिवा सीएसएमटी लोकल सुरू करावी, कारण दिव्याच्या प्रवाशांना सकाळच्या वेळी रेल्वेमध्ये चढणे खूप जिकरीचे असते आणि बरेच वेळा अपघातही झाले आहे, ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. प्रसंगी दिवा स्टेशन मॅनेजर गुप्ता, आरपीएफ अधिकारी तिवारी, मनोज यादव मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनोद भगत, समीर चव्हाण, सचिन भोईर, रोशन भगत, युवराज यादव, प्रफुल साळवी, नितीन कोरगावकर, किरण कोरगावकर, रवी मुणनकर, संदेश सावंत, गोविंद घाडीगावकर इ.संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in