
उल्हासनगर : शनिवारी रात्री घडलेल्या हत्येने अंबरनाथ शहर पुन्हा हादरले आहे. एका किरकोळ वादाचा शेवट असा भयंकर होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. एका १८ वर्षीय तरुणाचा चाकू भोसकून जीव घेतला गेला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. रात्रीच्या अंधारात घडलेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वाद नव्हता, तर मानवी संवेदनशून्यतेचे एक भयानक दर्शन होते. या घटनेत आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
अंबरनाथच्या बारकूपाडा या शांत परिसरात रात्रीच्या वेळी घडलेली एक भयंकर घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका किरकोळ वादातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला, ज्यात तुषार धेडे (१८) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र महेश धाबी गंभीर जखमी झाला आहे. आरोपी समीर मुन्ना वाघे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तुषार धेडे आणि त्याचा मित्र महेश धाबी रात्रीच्या वेळी बारकू पाडा परिसरात उभे होते.
यावेळी समीर मुन्ना वाघे या आरोपीचा महेशसोबत किरकोळ वाद झाला. हा वाद वाढत असताना, तुषारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या समीरने तुषारवर चाकूने वार केले. या घटनेत तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर महेश गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तुषारला मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.