आनंद दिघे ठाकरेंना नकोसे झाले होते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची प्रसिद्धी उद्धव ठाकरे यांच्या नजरेत खुपत होती. त्यामुळे आनंद दिघे यांचे जिल्हाप्रमुखपद काढण्याचे कारस्थान आखण्यात आले होते, त्यांच्या जागी...
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची प्रसिद्धी उद्धव ठाकरे यांच्या नजरेत खुपत होती. त्यामुळे आनंद दिघे यांचे जिल्हाप्रमुखपद काढण्याचे कारस्थान आखण्यात आले होते, त्यांच्या जागी पर्याय देण्याचे कामही सुरू होते, आनंद दिघे यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच धर्मवीर चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या. परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार, असेही ते म्हणाले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवारी, टीपटॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आनंद दिघेंना मातोश्रीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकच होता. त्याचे नेतृत्व आनंद दिघे हे करत होते. त्यांना मातोश्रीने पद आणि जिल्हा सोडायला सांगितले होते. परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर, आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही, असे अनेकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला, असेही ते म्हणाले.

दिघे हे फकीर माणूस होते, दोन्ही हाताने वाटणारे होते आणि शाखेत राहत होते. पण दिघे यांच्या निधनानंतर मला त्यांची मालमत्ता विचारली. तेव्हाच आपण चुकीच्या ठिकाणी असल्याची जाणीव झाल्याचे ते म्हणाले. परंतु नाइलाजाने काम करत होतो, असेही ते म्हणाले. आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. यामुळे दिघे बैचेन होते, असे सांगितले. दिघे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून राज ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.

सिनेमात जे काही दाखवले राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी पद दिले हे खोटे आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सिनेमात ते खरे दाखवणार आहे. राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला. परंतु त्यांनी दिला नाही. राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले. तेव्हा मोरे समजूतदार होते. त्यांनी म्हटले, दिघेंनी जो निर्णय घेतला तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिल्कूल काही बोलू नको असे त्यांनी सांगितले. राजन विचारे दिघेंना खूप काही बोलले. त्यानंतर आनंद आश्रमात दिघे यांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावले. विचारे हे दिघे यांचे नकली शिष्य आहेत. दिघेंना ज्याने कायम त्रास दिला, ते आम्हाला माहिती आहे. दिघे यांचे जिल्हाप्रमुख काढण्याचे करून प्रतिस्पर्धी उभे करण्याचे कामही सुरू होते, असेही ते म्हणाले.

राजन विचारेंनी दिघेंना शिव्याशाप दिले

सभागृह नेतेपद काढून घेण्यात आले तेव्हा राजन विचारे यांनी आनंद दिघे यांना शिव्याशाप दिले. विचारे राजीनामा देण्यास तयार नव्हते. तेव्हा देखील मी एकनाथ शिंदे यांना सांगत होतो की, हा माणूस दिघे यांचा झाला नाही, तर तो आपला कसा काय होणार, अशा शब्दांत ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका केली. दिघे यांचा नवरात्र उत्सव, हंडी सुरू असतानाही टेंभी नाक्यापासून हाकेच अंतरावर विचारे यांनी देवी आणि हंडी उत्सव सुरू केला. दिघे यांच्या नावाने ट्रस्ट तयार केली होती. परंतु ती रद्द करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. दिघे यांचे नाव हिरानंदानी मेडोज येथील नाट्यगृहाला देण्याचा ठराव झाला होता. परंतु त्यांचे नाव दिले जाऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दिघे यांचा उद्धव यांनी मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नरेश म्हस्केंना कानपिचक्या

खासदार झाल्यावर नगरेसवक, आमदार यांच्या कोणत्याही कामात आडकाठी करायची नाही. महापालिकेत लक्ष घालायचे नाही, खासदार होऊन दिल्लीत काम करायचे, खासदार झाल्यावर फोन बंद ठेवायचा नाही. आता बदलणार नाही, तर बदलावे लागेल, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हस्के यांना दिल्या.

नगरसेवकांना इशारा

ही निवडणूक खुप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या उमेदवाराला आपापल्या भागातून लीड द्यायला हवा. लीड दिला नाही; तर मात्र तुम्हालाही तिकीट द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in