इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट; जितेंद्र आव्हाड यांची फडणवीस यांच्या विधानावर टीका

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर केवळ छावणी लुटली होती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर केवळ छावणी लुटली होती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी सुरतमध्ये असलेल्या फ्रेंच, डच, मुगल, पोर्तुगाल अशा सर्व श्रीमंत कंपन्या महाराजांनी साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी लुटल्या. महाराजांची लढाई ही साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी होती. मात्र मनुवाद्यांकडून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली. केवळ एक छावणी लुटून महाराजांना छोटे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत वैचारिक लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला.

आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केले होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

“कोकणातून पर्यटक पळवा नवीन योजना”

४५ किलोमीटर प्रति ताशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने महाराजांचा पुतळा पडला या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावरही आव्हाड यांनी खोचक टोला लगावला. अवघ्या ४५ किमी ताशी वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो, तर आपणही वाहून उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ! राज्य सरकारची “कोकणातून पर्यटक पळवा योजना” असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in