बाबरी ढाचा कधीच मस्जिद नव्हती, तो एक कलंक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाण्यात वक्तव्य

बाबरी ढाचा कधीच मस्जिद नव्हती, तो एक कलंक होता, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.
बाबरी ढाचा कधीच मस्जिद नव्हती, तो एक कलंक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाण्यात वक्तव्य

प्रतिनिधी/ठाणे

बाबरी ढाचा कधीच मस्जिद नव्हती, तो एक कलंक होता, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. काही लोक या कार्यक्रमाला जात नाहीत, काही लोक प्रश्न विचारतात मोदींनी काय केलं, मी त्यांना प्रश्न विचारतो, २००७ साली यांनीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, की रामाचा जन्म तिथेच झाला याचा पुरावा नाही, राम जन्मभूमीवरील आपला हक्क काढण्याची यांनी तयारी केली होती, असा आरोपही फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्यातील गावदेवी मैदानात तीन दिवसीय भव्यदिव्य रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनपर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी' या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, २२ जानेवारीला प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होतेय हे आपलं भाग्य आहे आहे आहे. २२ जानेवारीचा दिवस सर्व कारसेवकांसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे या रामायण महोत्सवाचे उद्घाटन मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर कारसेवक म्हणून करत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजी नवभारताची निर्मिती करत आहे, २२ जानेवारीपासून गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थानावर

कोविडच्या नंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण आपल्या भारताची अर्थव्यवस्था कोलमडली नाही. आता पाचव्या क्रमांकावर आपण आलो आहोत, कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदींनी आपल्याला आठवण करून दिली. आता जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये भारताचा क्रमांक चीनला देखील मागे टाकले आहे. इनोव्हेशनमध्ये आज आपली परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इनोवेशन सुरू केलेले आहे की भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवलं जे अमेरिकेलाही जमलं नाही. जे जपानलाही जमलं नाही. हे भारताने करून दाखवलं आणि आता सूर्याचे देखील मॅपिंग आपण करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी सांगितले इथेच रामाचा जन्म झाला!

"राम राज्याची संकल्पना आपण पहिल्यांदा मांडत नाही, राम मंदिर काल्पनिक आहे सांगणारे हे लोक आहेत. पण नरेंद्र मोदी यांनी सांगितले इथेच रामाचा जन्म झाला, तिथेच ६४ खांब उभे राहिले, इथेच मूर्ती सापडल्या, त्यामुळे मंदिर तिथेच उभे राहणार. एक भारत, श्रेष्ठ भारत ही मोदींची संकल्पना आहे. सुशासन पारदर्शिता समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य असल्याचे फडणवीस म्हणाले. हे राम कार्य आहे, त्यामुळे यात भ्रष्टाचार चालणार नाही, मोदींनी सांगितलंय एक रुपया पाठवेल, तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत एक रुपयाच पोहचेल गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम मोदींनी घेतला असून, २५ कोटींच्या वर लोक गरिबी रेषेच्या वर आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in