Badlapur : बारा वर्षांत एकही नवीन साधी लोकल नाही; वाढत्या प्रवासी संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर
बदलापूर : कल्याणपलीकडील उपनगरी रेल्वे सेवेत मागील बारा वर्षांत एकही नवीन साधी लोकल सुरू झालेली नसल्याने बदलापूर, अंबरनाथ, वांगणी या वाढत्या लोकसंख्या असलेल्या पट्ट्यात प्रवाशांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. वाढती गर्दी, मर्यादित गाड्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
गेल्या दोन दशकांत या भागातील नागरीकरण वेगाने वाढले आहे. हजारो नागरिक रोज बदलापूर-कल्याण-ठाणे-मुंबई असा लोकलने प्रवास करतात. मात्र गाड्यांची संख्या वाढलेली नसल्याने प्रत्येक लोकल अक्षरशः खचाखच भरलेली असते. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत तर प्लॅटफॉर्मवर आणि डब्यांच्या दरवाज्यांवर जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
प्रवासी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून वारंवार लोकल गाड्यांची संख्या वाढवणे, विद्यमान गाड्यांना अधिक डबे जोडणे, तसेच महिला विशेष लोकल सुरू करण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. मात्र त्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले
जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा गर्दीमुळे अपघातांची शक्यता वाढत राहील, अशी भीतीही प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
कल्याणपलीकडील उपनगरी रेल्वे सेवेत मागील बारा वर्षांत एकही नवीन साधी लोकल आलेली नाही. या दरम्यान लोकसंख्या आणि पर्यायाने प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तातडीने नवीन लोकल गाड्या सुरू करणे, डब्यांची वाढ करणे किंवा कल्याण-कर्जत शटल सेवा सुरू करणे अत्यावश्यक झाले आहे.
मनोहर शेलार, सदस्य उपनगरी रेल्वे उपभोक्ता समिती

