
बदलापूर : धारदार शस्त्राने वार करून मुलाने वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात समोर आली आहे. गाळ्याच्या भाड्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार झाला असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली आहे.
बुधवारी सकाळी आठच्या सुमारास बदलापूर पश्चिमेकडील बेलवली भागातील अनंत कराळे यांच्या दुकानाच्या गाळ्यात हा प्रकार घडला. बेलवली भागात राहणारे अनंत कराळे यांचे या भागात दोन गाळे आहेत. या गाळ्यांपैकी एकाचे भाडे वडिलांनी आणि एकाचे मुलाने घ्यावे असे ठरले होते. मात्र वडील दोन्ही गाळ्यांचे भाडे घेण्यास जबरदस्ती करत होते. त्यातून गेल्या सात आठ वर्षांपासून अनंत कराळे व त्यांचा मुलगा गणेश यांच्यात याच भाड्यावरून वाद होत होते.
बुधवारी सकाळी अनंत कराळे व त्यांचा मुलगा गणेश बेलवली येथील दुकानाच्या गाळ्यात आले. त्यावेळी पुन्हा त्यांच्यात यावरून वाद झाला आणि गणेशने अनंत कराळे यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर गणेश कराळे याला अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.