अग्निपथ योजना, महागाई, बेरोजगारी आदींच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या बहुजन समाज पार्टीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून प्रांताधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन दिले आहे.
अग्निपथ योजनेद्वारे भारताची संरक्षण यंत्रणा खाजगी करण्याचा केंद्रीय सरकाराचा डाव आहे. अग्निपथ योजना ही भारतीय संविधानाच्या विरोधी असून एस.सी/एस.टी/ओ.बी.सी. तथा अल्पसंलख्यांक तसेच दलित व बहुजन वर्गाच्या विरोधात आहे. एकूणच देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या राज्यातील महागाई कमी करण्यात यावी व महागाईमुळे झालेल्या जनतेला केंद्र सरकारने महागाई भत्ता योजना सुरू करावी, सरकारी संपत्तीचे व कंपन्याचे खाजगीकरण थांबवावे अथवा खाजगी क्षेत्रामध्ये दलित बहुजन समाजाला आरक्षण देण्यात यावे, नवीन शिक्षण धोरण हे शिक्षणाचे खाजगीकरण करणारे आहे. त्यामुळे नवीन शिक्षण धोरण योजना बंद करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या आंदोलनात शहराध्यक्षा निवेदिता जाधव, प्रदेश सचिव सुदाम गंगावणे (महाराष्ट्र प्रदेश सचिव), रमेश धनवे (प्रभारी उल्हासनगर विधानसभा), दिपक जाधव (अध्यक्ष उल्हासनगर विधानसभा), अतिश जाधव (महासचिव- उल्हासनगर शहर), शीतल भिसे (उपाध्यक्ष विधानसभा), मनोज गायकवाड (महासचिव अंबरनाथ विधानसभा) लक्ष्मण महाले तसेच विकास जाधव सह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.