केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 1 जुलै पासून एकल प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता महापालिकेच्या दहाही प्रभागात 10 स्वतंत्र पथके निर्माण करुन, प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात विशेष कारवाई करण्यात येत आहे. कारवाई अंतर्गत महापालिकेच्या सर्व प्रभागात अनेक ठिकाणी, मंगळवारी दिवसभरात धडक कारवाई करण्यात आली. सर्व प्रभागातील एकुण 280 आस्थापनांकडून 77.2 किलो प्लास्टिक जप्त करून 1,80,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई प्रत्येक प्रभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम, अनधिकृत बांधकाम नियंत्रण व फेरीवाला प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी, पोलिस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.