कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व मार्शल यांनी कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रतिबंधित प्लास्टिकवर जप्तीची धडक कारवाई करून सुमारे २ किलो ३०० ग्रॅम प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडून २५,००० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे सदर ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे कमी होण्याच्या दृष्टीकोनातून तेथील ७५ आस्थापनांना महिला बचत गटाच्या माध्यमातून ५२० नग कापडी पिशव्या देण्यात आल्या.
महाराष्ट्र शासनाने एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असून विक्रेता अथवा ग्राहक यांच्याकडे प्लास्टिक पिशवी आढळून आल्यास पहिला गुन्हा ५,००० रुपये दंड, दुसरा गुन्हा १०,००० रुपये दंड व तिसरा गुन्हा २५,००० रुपये दंड अशा तरतुदी आहे. नागरिकांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.