

भिवंडी : भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीचे पात्र शनिवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भरून वाहू लागले. परिणामी नदीकाठच्या घाटासह नदी लगतच्या म्हाडा कॉलनी, संगम पाडा, ईदगहा या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरले. अशा परिस्थिती मध्ये सायंकाळी म्हाडा कॉलनी येथे राहणारा दहा वर्षीय आतिफ इरफान शेख हा मुलगा कचरा फेकण्यासाठी गेला असता पाय घसरून नदी पात्रात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सकाळी साडेसहाच्या सुमारास म्हाडा कॉलनी जवळील पात्रात आढळला.
भिवंडी शहरातील चाविंद्रा गावच्या हद्दीत कामवारी नदीपात्रात मित्रांसोबत रविवारी खेकडे पकडण्यासाठी गेलेला १७ वर्षीय युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाला. गैबीनगर येथील गुलजार नगर येथे राहणारा मोहम्मद गौस नफीस अन्सारी हा आपल्या तीन चार मित्रांबरोबर खेकडे पकडण्यासाठी नदीपात्रा जवळ बसला असताना बाकीचे मित्र खेकडे पकडत होते. मोहम्मद गौस हा पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रामध्ये बुडाला.या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे आपल्या पथकासह अग्निशामक - जवानांसह घटनास्थळी पोहचले व त्यांनी बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.