
भिवंडी : भिवंडी शहरातील बेवारस वाहने हटवण्याबाबतचा अधिकार महापालिकेला महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार प्राप्त झाला असून अशी बेवारस वाहने हटवण्याचे आवाहन नागरिकांना मनपाकडून करण्यात आले आहे, तर अशी बेवारस वाहने हटवण्याची कारवाई महापालिकेकडून लवकरच सुरू केली जाणार असून होणाऱ्या नुकसानीला सर्वस्वी वाहनमालकच जबाबदार असल्याची माहिती महापालिकेच्या वाहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिका आयुक्तांना महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर वा पदपथावर ठेवण्यात आलेली वाहने नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
या महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे व बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचा ठराव १७ एप्रिल रोजी पारित झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर, पदपथावर व महानगरपालिकेच्या अन्य क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे उभी केलेली अथवा बेवारस वाहने न हटविल्यास महानगरपालिकेमार्फत सदर वाहने हटवून वाहन हटविण्याच्या खर्चापोटी (टोइंग व पार्किंग) ची रक्कम, तसेच दंड वसूल करून सदर कार्यवाहीमुळे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी वाहनमालक जबाबदार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.