

भिवंडी : ठाणे-भिवंडी मार्गावरील राहनाळ गावच्या हद्दीत खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा दुचाकीवरून पडल्याने ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.
सुनिता अक्षयलाल पाल (४६) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत सुनिता या ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. त्या पती अक्षयलाल पाल यांच्यासोबत दुचाकीने भिवंडीत फ्लॅट पाहण्यासाठी येथील अंजूर फाटा परिसरात येत असताना दुचाकी खड्यात आदळून घसरली.
या अपघातात अक्षय आणि सुनिता दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी अक्षय रस्त्याच्या कडेला पडल्याने किरकोळ जखमी झाला. मात्र सुनिता रस्त्याच्या मधोमध पडल्याने पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुनिताला चिरडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.