मंद वाहतुकीच्या शहरांमध्ये भिवंडी पाचव्या स्थानावर ; जगाच्या सर्वेक्षणात भिवंडीची वाहतूक कासवगतीची

केंद्र व राज्य रस्ते प्राधिकरणाच्या ३० वर्षे दुर्लक्षाचा फटका
मंद वाहतुकीच्या शहरांमध्ये भिवंडी पाचव्या स्थानावर ; जगाच्या सर्वेक्षणात भिवंडीची वाहतूक कासवगतीची

भिवंडी : स्वातंत्र्यापूर्वीपासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून सुरू झालेला आग्रारोड महामार्ग क्र.१ हा भिवंडीतील अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका ते नदीनाका मार्गे आग्रा-दिल्ली येथे जात होता. मात्र सध्याचा मुंबई-नाशिक महामार्ग सन १९९२ पूर्वी तयार झाल्यानंतर भिवंडीतून जाणारा मार्ग या महामार्गाला काही वर्षे राज्यमार्ग करण्यात आले. त्या दरम्यान तत्कालीन भिवंडीच्या भिवंडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अंजूरफाटा ते नदीनाका हा राज्यमार्ग राज्यसरकारच्या मान्यतेने नगरपालिकेत समाविष्ट करून घेतल्याने महामार्गावरील जड वाहने शहरातून जाणे बंद झाले. त्यानंतर गेली तीस वर्षात केंद्र व राज्य सरकारने टोल संस्कृती आणली आणि वाढत्या वाहनांच्या संख्येनुसार कोणतीही उपाययोजना न केल्याने भिवंडी आणि परिसरात विविध समस्या उभ्या राहून भिवंडीची जलद्गतीची वाहतूक सध्या कासवगतीची झाली आहे. ठाणे महानगरपालिकेचे नागरी क्षेत्र वाढल्याने ठाण्याच्या शहराबाहेरील गोदामे सन १९८९पासून भिवंडी तालुक्यात येऊ लागली. तालुक्यातील राहनाळ गावापासून नवीन गोदामे हळूहळू स्थापित होण्यास सुरुवात झाली आणि आता ग्रामीण भागात प्रचंड गोदामे होऊन भिवंडीचा ग्रामीण भाग आंतरराष्ट्रीय गोदाम हब बनला आहे. गोदामाच्या निमित्ताने आणि येथे नव्याने झालेल्या विकासांतर्गत गेल्या ३० वर्षात भिवंडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.

भिवंडी तालुका आणि भोवताली असलेल्या शहरात वाहनांची संख्या वाढून त्याचा परिणाम भिवंडीच्या वाहतुकीवर झाला. परिणामी रस्ते रुंद न झाल्याने आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निर्माण न केल्याने तसेच वाहतुकीच्या वाहनांच्या मागणीनुसार रस्त्यांचे नियोजन केंद्र महामार्ग रस्ते प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दुर्लक्षित केल्याने भिवंडीतील वाहतूक मंदावली आणि जगाच्या सर्वेक्षणात भिवंडीची वाहतूक कासवगतीची झाल्याचा ठपका बसला. वाहतूक वेगाच्या बाबतीत जगातील सर्वात १० कमी शहरांपैकी तीन शहरे भारतातील आहेत. अमेरिकेतील संशोधन संस्थेच्या निष्कर्षानुसार व अहवालानुसार महाराष्ट्रातील भिवंडी देशातील कलकत्ता आणि बिहारमधील आराह या शहराचा जगातील १० सर्वात मंद वाहतूक शहरामध्ये समोवश करण्यात आला आहे.

मोटारवाहनांचा प्रवास वेग अमेरिकेचा जास्त

नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (NBER)ने केलेल्या या अभ्यासात १५२ देशातील १२०० शहराचा या मध्ये समावेश आहे. त्यांच्या अहवालानुसार "द फास्ट, द स्लो अँड द कंजस्टेड अर्बन ट्रान्सपोर्टेशन इन रिच अँड पुअर कंट्रीज' च्या अहवालानुसार दिवसभरातील मोटारवाहनांचा सरासरी प्रवास वेग अमेरिकेतील फ्लिंट (यूएस)मध्ये सर्वाधिक आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सर्वात कमी आहे. बोगोटा (कोलंबिया) मध्ये सर्वात जास्त गर्दी आहे. त्यात असेही म्हंटले आहे की, १० पैकी नऊ शहरे सर्वात कमी गर्दी नसलेली शहरे बांगलादेश, भारत आणि नायजेरियामध्ये आहेत. ३ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १ हजाराहून अधिक शहरामधील रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी गुगल नकाशावरील डेटा वापरला.

भिवंडीची वाहतूक गती कमी

भिवंडी जगातील २० कमी गतीच्या शहरांमध्ये ५ व्या स्थानावर आहे. त्यानंतर कलकत्ता(६), अराह (७), बिहार शरीफ (११), मुंबई(१३), ऎझॉल(१८), बंगळुरू(१९), आणि शिलॉंग (२०) व्या स्थानावर आहे. वाहतूककोंडीच्या मापदंडावर बंगळुरू जगातील २० गर्दीच्या शहरांमध्ये ८ व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई (१३) आणि दिल्ली (२०व) क्रमांकावर आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार श्रीमंत देशातील शहरी प्रवासी गरीब देशातील प्रवाशांच्या तुलनेत सुमारे ५० टक्के जास्त वेग अनुभवतात,असे या अहवालात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in