ठाणे : मनपातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. रविवारी झालेल्या सात विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यांत भाजपच्या आमदारांना आणि उपमहापौरांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे.
या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आयुक्तांना पत्र पाठवून सातही प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे.
उपमहापौर पाटील यांनी पत्रात म्हटले की, ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असताना केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या आमदारांसह उपमहापौरांनाच निमंत्रण न देणे हे राजकीय हेतूने केलेले कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला.