

ठाणे : मुंबई-वडोदरा महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात बदलापूर येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला असून, कारचा वेग २५१ किमी प्रतितास असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. टिटवाळा येथून बदलापूरच्या दिशेने जात असताना इरांजाडजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार प्रथम महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर ती अनेकदा उलटली.
या अपघातात योगेश दिघे आणि रिकाबा जेकब (दोघेही रा. बदलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचे पूर्णपणे नुकसान झाले असून त्याचे अवशेष महामार्गावर शेकडो मीटरपर्यंत पसरले होते. कारमधील तिसरा तरुण, आनंद हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही मित्र शनिवारी रात्री टिटवाळा येथे एका वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावून परतत होते. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, कारचा अतिवेग आणि चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, यासह विविध बाजूंनी तपास केला जात आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे मद्यपान केल्याची पुष्टी झालेली नाही. फॉरेन्सिक अहवाल आणि वाहनाच्या तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
अवयव अर्धा किमीवर
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांतील हा सर्वात भीषण अपघात होता. अपघाताच्या भीषणतेचा अंदाज यावरून येतो की, एका मृतदेहाचे अवयव धडकेच्या ठिकाणापासून सुमारे ५०० मीटर दूर अंतरावर फेकले गेले होते.