
डोंबिवली : मध्य रेल्वेतील सर्वात जास्त गर्दीचे रेल्वे स्थानक डोंबिवली आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्यात आल्या असल्या तरी गर्दी कमी झाल्याचे दिसून येत नाही. यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी लक्ष देत पालिका आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली. पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
याबाबत आमदार मोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, डोंबिवलीकरांना ठाणे शहरात जाण्याकरिता रेल्वेच्या गर्दीतून जाण्याची गरज भासणार नाही. डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयजवळ ते ठाणे आणि दोन टाकी ते ठाणे शहर अशी परिवहन बससेवा सुरू होणार आहे. आपल्या मागणीचा विचार करून बससेवा सुरू करणार असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांचे आभार मानले. डोंबिवली ते ठाणे अशी बससेवा सुरू होणार असल्याने आता ठाणे शहरापर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. तिकीट दराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
रेल्वे अपघातावर नियंत्रण येणार
सकाळच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून पडून अनेक अपघात झालेत. मात्र आता डोंबिवली ते ठाणे परिवहन बससेवा सुरू होणार असल्याने डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या स्थानकादरम्यान रेल्वे अपघातांवर नियंत्रण येईल, असे डोंबिवलीकर म्हणत आहेत.