
अलिबाग : अलिबाग एसटी बस अपघातात १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर एसटी बसेसची तोडफोड करणाऱ्या तसेच वाहतूक रोखून धरणाऱ्या ३३ जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, शांतता भंग करून तणाव निर्माण करणे, यासारख्या कलमांखाली या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग शहरात एसटी बस स्थानकासमोर झालेल्या एसटी बसच्या धडकेत जयदीप शंकर बना या मुलाचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने दोन एसटी बसेसची तोडफोड केली. शहरातील रहदारीचा मुख्य मार्ग जवळपास तीन तास रोखून धरला. जमावबंदी आदेश लागू असताना दीडशे ते दोनशे जणांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. पोलिसांनी वांरवार विनंती करूनही जमाव शांत होत नव्हता. त्यामुळे शिघ्रकृती दलासह वाढीव पोलीस बंदोबस्त मागवून पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या प्रकरणी आता आंदोलन करणाऱ्या आठ जणांसह इतर अज्ञात २० ते २५ जणांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस उप निरीक्षक प्रतिक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा
अलिबाग एसटी आगार परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे लवकरच सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.