
कल्याण : कल्याण-डोंबिवलीकरांना गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कचरा आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 'चेन्नई पॅटर्न' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच तर चेन्नईनंतर देशातील दुसराच उपक्रम असणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी १८ मे रोजी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण केले जाणार आहे.
चेन्नई केवळ भारतातील नव्हे तर जगातील लंडननंतरची सर्वात जुनी महानगरपालिका आहे. कल्याण-डोंबिवली शहरापेक्षा कितीतरी पट अधिक क्षेत्रफळ आणि जवळपास तिपटीने लोकसंख्या असणारे मेट्रोपॉलिटन शहर आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच कमी जागेमध्ये घनदाट लोकसंख्या असल्याने काही वर्षांपूर्वीपर्यंत इकडेही कचऱ्याच्या समस्येने नागरिक आणि महापालिका प्रशासन हैराण झाले होते. मात्र साधारणपणे जानेवारी २०२० च्या म्हणजेच कोविडच्या काळापासून चेन्नईने कचरा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी यशस्वीपणे राबवलेल्या अनोख्या 'कचरामुक्त शहर' उपक्रमाचे देशभर कौतुक केले जात आहे. चेन्नई महानगरपालिकेने उरबेसर सुमीत या जागतिक कीर्तीप्राप्त संस्थेच्या माध्यमातून चेन्नई शहराचा कचरा आणि शहर स्वच्छतेमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. विशेष म्हणजे चेन्नईतील नागरिकांनीही या अनोख्या उपक्रमाला तितक्याच सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्यानेच गेल्या चार वर्षांत या उपक्रमाने शहर स्वच्छतेमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता हाच
शहर स्वच्छतेचा 'चेन्नई पॅटर्न' कल्याण - डोंबिवलीमध्ये राबविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
केडीएमसी प्रशासनाकडून ४५ नॉर्मस् (निकष)
यापूर्वी किती कचरा उचलला जायचा त्याच्या वजनावर संबधित संस्थेला देयक दिले जायचे. मात्र या नवीन संकल्पनेनुसार केडीएमसी प्रशासनाकडून यासाठी तब्बल ४५ नॉर्मस्(निकष) बनवण्यात आले आहेत. हे सर्व नॉर्मस् आणि 'की परफॉर्मन्स इंडिकेटर' तपासूनच या कामाचे देयक दिले जाणार आहे आणि त्यांची पूर्तता न झाल्यास संस्थेवर दंडात्मक कारवाईची तरतूदही महापालिकेकडून करण्यात आली आहे. हा या उपक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग (USP) असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२४ तास ३ शिफ्टमध्ये काम चालणार
कचरा संकलन, वाहतूक आणि रस्तेसफाई या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर या कचरामुक्त शहराच्या संकल्पनेमध्ये अधिक भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्याला तंत्रज्ञानाची उत्तम साथ अशी सांगड घालण्यात आली आहे. दिवसातील २४ तास ३ शिफ्टमध्ये हे काम चालणार असून प्रत्येक घराबाहेरील कचरा उचलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही, तर यासोबतच शहरातील मुख्य असो की अंतर्गत रस्त्यांच्या परिणामकारक स्वच्छतेसाठी कुशल मनुष्यबळासोबतच पॉवर स्वीपर मशीनचाही समावेश असणार आहे.
पहिल्या टप्प्यात ७ प्रभागांची निवड
पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या ७ प्रभागांची (डी, इ, एफ, जी, एच, आय, जे वॉर्ड) निवड करण्यात आली आहे. या सातही प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट या संस्थेच्या माध्यमातून 'कचरामुक्त शहर' उपक्रम राबविण्यासाठी कचरा संकलन वाहतूक आणि रस्तेसफाईचे अतिशय सूक्ष्म पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.