
अंबरनाथ : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना रेल्वे आणि मेट्रो या दोन्ही वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार असून चिखलोली स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे.
मेट्रो ५च्या या विस्तारामुळे नागरिकांना ठाणे गाठणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे, चिखलोली रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत. याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी याबाबत मागणी देखील केली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतूक वेगवान होण्याच्या दृष्टीने मेट्रो ५ चा विस्तार आता या भागातील विकासाचे नवे दालन उघडणारे ठरणार आहेत.
'एक शहर, एक मेट्रो नेटवर्क' संकल्पना
सध्या या मेट्रो प्रकल्पाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, 'एक शहर एक मेट्रो नेटवर्क' या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात होणार आहे.
थेट दारापर्यंत मेट्रोची सेवा
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ हा प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. या मार्गावर बिर्ला कॉलेज, शहाड, आणि उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना थेट दारात मेट्रोची दारात सेवा मिळणार आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ शहरातून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या दोन्ही स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीचा ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी दोन्ही शहराच्या मध्यभागी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या दरम्यान आता मेट्रोची देखील चिखलोली रेल्वे स्थानकातून द्विस्तरीय वाहतूक झाल्याने गर्दीचा ताण अधिक कमी होणार आहे. याच हेतूने येथून मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार