मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील वंदना बुधर यांच्या बालकांच्या मृत्यूनंतर मर्कटवाडी हे गांव केवळ सुलभ रस्त्या अभावी चांगलेच प्रकाश झोतात आले होते.त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले स्थानिक आमदार सुनील भुसारा यांनीही हा प्रश्न चांगलाच लावून धरला होता. परिणामी जव्हार मोखाडाच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ महिन्यांचा अल्टीमेटम देत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
मर्कटवाडी येथील रस्त्याचा प्रश्न ब-याच वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरुवातीला येथील सिता दिवे या महिलेचे बालक केवळ रस्त्या अभावी वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने रस्याबाबत पहिली ठिणगी पडली होती. त्यानंतर वंदना बुधर यांनी आपली २ जुळी बालके गमावल्यानंतर येथील रस्त्याचा प्रश्न चिघळला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आदेश जारी करून ३ महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण पूर्ण करण्याचे अल्टीमेटम दिल्याने अखेर अधिक्षक अभियंता विलास कांबळे यांनी तातडीने मर्कटवाडी येथे भेट देऊन रस्त्याची पाहणी केली असून आठवडा भरात निविदा प्रक्रियासह आवश्यक ती पूर्तता करुन ३ महिन्यात रस्ता पूर्ण करणार असल्याचे सुतोवाच कांबळे यांनी केले आहे.
यावेळी जि.प.सदस्या कुसूम झोले, आदिवासी आघाडीचे मिलींद झोले मोखाडा उप अभियंता विशाल अहिरराव उपस्थित होते.