बदलापूर रेल्वे स्थानकात नव्या रेल्वे पादचारी पुलाची उभारणी करण्यात येत आहे. रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनाने या कामाला सुरुवात केली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे जुन्या रेल्वे पादचारी पुलाच्या दुरवस्थेमुळे बदलापूरकरांची होत असलेली मोठी गैरसोय टळणार आहे.
बदलापूर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर कर्जत दिशेला रेल्वे पादचारी पूल आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल पूर्वेला मच्छी मार्केटजवळ तर पश्चिमेला बाजारपेठेत उतरतो. परंतु गेल्या अनेक वर्षात या पुलाची देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
पुलावरील तसेच पुलाच्या पायऱ्यांवरील लाद्या निखळलेल्या असून पुलाखालून रेल्वेगाड्या येत-जात असताना पूल हलल्याचे जाणवत असल्याने त्यावर चालणे नागरिकांना धोकादायक वाटत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या पुलाचा वापर टाळून रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करत आहेत. यामुळे तातडीने या पादचारी पुलाची डागडुजी व्हावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सन २०१८ मध्ये या रेल्वे पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची तातडीने दुरुस्ती-डागडुजी करावी अशी मागणी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनाही त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले होत.
आता रेल्वे प्रशासनाने दुरवस्था झालेल्या जुन्या रेल्वे पादचारी पुलाला समांतर नवा रेल्वे पादचारी पूल उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत महत्वाचा टप्पा असलेल्या गार्डर टाकण्याच्या कामाला रविवारी सुरुवात झाली आहे.