प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू ; रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने राहुलचा अंत

उल्हासनगर कॅम्प १ येथील ३० वर्षीय राहुल इंदाटे याला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू ; रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने राहुलचा अंत
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प १ येथील ३० वर्षीय राहुल इंदाटे याला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाच्या व आरोग्य यंत्रणेच्या वादग्रस्त कार्यक्षमतेचा पर्दाफाश करणारी ही घटना आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने राहुलच्या जीवनातील शेवटच्या क्षणांमध्ये उपचारासाठी झगडणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना दु:खद धक्का ठरली.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ हर्षवर्धननगर एमआयडीसी वॉटर टॅंक येथे राहणाऱ्या राहुल इंदाटेची प्रकृती बुधवारी मध्यरात्री अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उल्हासनगर कॅम्प ३ मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती आणखी गंभीर होत असल्याने राहुलच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात अहवाल सादर केल्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात चाचण्या केल्यानंतर राहुलची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. या परिस्थितीत तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. दुपारी ३ वाजता डॉक्टरांनी राहुलला डिस्चार्ज दिला, पण त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरची गरज होती.

कुटुंबीयांनी शासनाच्या १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, रुग्णवाहिनी वेळेवर न पोहोचल्याने उपचारांमध्ये विलंब झाला. या विलंबामुळे राहुलला कळवा रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात अडथळा आला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

या हृदयद्रावक घटनेनंतर स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. समाजसेवक शिवाजी रगडे यांनी याबाबत निषेध नोंदवत संबंधित डॉक्टर व १०८ रुग्णवाहिका सेवा कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'सरकारी यंत्रणेचा हा प्रकार असह्य आहे. एका निष्काळजीपणामुळे बळी गेला. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी रगडे यांनी केली आहे.

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत पुन्हा प्रश्न

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत संबंधित तक्रारी यापूर्वीही वेळोवेळी समोर आल्या आहेत. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. ही घटना आरोग्य यंत्रणेच्या अपयशाचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. आरोग्य व्यवस्थेत वेळेवर सेवा मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेतील त्रुटींमुळे त्याच्या कारभारावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रशासनाला या समस्येचे गांभीर्य ओळखून सुधारणा करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटनांचे शिकार होणारे नागरिक अजूनही वाढत राहतील.

logo
marathi.freepressjournal.in