राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला
राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता व अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. ठाणे शहर भाजपच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील विविध भागात रॅलींबरोबरच मान्यवर व्यक्तींकडे तिरंगा मानाने सुपूर्द केला जात आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला आहे. या रथाचे व तिरंगा रॅलीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते संजय वाघुले, मनोहर डुंबरे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार अमृत महोत्सवात घरोघरी तिरंगा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तिरंगा हा अस्मिता व अभिमानाचे प्रतिक आहे. देशाचा सैनिक हा तिरंगा फडकविण्यासाठी लढतो. मात्र, हरलो तर तिरंग्यात देह लपेटला जाईल, अशी सैनिकाची भावना असते. त्या राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा मानसन्मान वाढविण्यासाठी, ठाण्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवावा. त्याचबरोबर अमृत महोत्सवानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाही महाराष्ट्र व बलशाही राष्ट्र घडविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान, भाजप ठाणे शहराच्या वतीने हर घर तिरंगा अभियानानिमित्ताने मंडलनिहाय प्रभातफेरी, तिरंगा रॅलीसह डॉक्टर व मान्यवर व्यक्तींना तिरंगा सन्मानाने प्रदान करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

कोपरी व राबोडी येथे भव्यरॅली काढून तिरंगा फडकविला गेला. या अभियानाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या विविध भागात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात देशभक्तीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी बाप्पा राऊत दूरध्वनी क्रमांक ७५०६२३१७७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in