
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढवतील अशी जोरदार चर्चा असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधूनच लढण्याचे संकेत दिले आहेत. राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकवायचा असल्याचे सांगत त्यांनी महायुतीतून लढण्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यानंतर आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना या तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. पालिका निवडणूक कधी लागतील याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी, आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई आणि ठाणे या दोन महापालिकांवर सुरुवातीपासून शिवसेनेचे वर्चस्व असून या पालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप देखील आग्रही आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढतील, अशी जोरदार राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.
महायुतीतील शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कशा लढल्या जातील, याविषयी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत आपले ६० आमदार निवडून आल्याने खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रिमंडळही तयार केले होते. हॉटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकिंग रद्द केले, असा टोला शिंदे यांनी लगावला. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, युवक, ज्येष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चारी मुंड्या चीत झाले.
पालिका, न.पा.मध्येही महायुतीचा भगवा फडकवायचाय
आता विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतूनच लढण्याचे संकेत दिले आहेत.