देश पातळीवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोव्हीड १९ चा भयंकर प्रसार होत असताना सुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ८० करोड जनतेला अविरत धान्य पुरवठा करून शासनाला महत्वाचे सहकार्य केले होते. अश्या महामारीत कोणताही भूक बळी झाला नाही. परंतु याची साधी दखल सरकारने न घेता परवाना धारकांना कोरोना योद्धा सुद्धा घोषित करण्यात आलेले नाही. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनांद्वारे परवाना धारकांना वर्ल्ड फूड प्रोग्रॅम अंतर्गत ४४० प्रति क्किटल कमिशन देण्यात यावे.किंवा दर महा ५० हजार मानधन घोषित करण्याची मागणी मुरुड तालुका रास्त भाव धान्य दुकान संघटनेतर्फे मुरुड तहसीलदार याना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे यांनी स्वीकारले. यावेळी मुरुड तालुका रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी, उपाध्यक्ष किशोर धामणस्कर, सचिव मंगेश कांबळे, अजित कासार, सचिन कासेकर व मुरुड तालुक्यातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर हे सर्व दुकानदार यांनी संपूर्ण दिवस धरणे आंदोलन केले.