कल्याण येथील सुभाष मैदानाची दुरवस्था; मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी मुख्य उद्यान अधीक्षकांची भेट

मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी मुख्यालयात मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत या समस्यांचा पाढा वाचला.
कल्याण येथील सुभाष मैदानाची दुरवस्था; मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी मुख्य उद्यान अधीक्षकांची भेट

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत तसेच पालिका मुख्यालयाला लागून असणाऱ्या ऐतिहासिक सुभाष मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, मैदानातील दुरवस्था लवकरात लवकर सुधरविण्यासाठी केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत त्यांना मैदानाच्या दुरवस्थेचे फोटो भेट दिले. येत्या १५ दिवसांत येथील परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मैदानात भीकमांगो आंदोलन करीत मैदानाची डागडुजी करण्याचा इशारा मनसेने दिला.

यावेळी मनसेचे माजी आमदार तथा मनसे शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी, मनसे महिला मुरबाड शहापूर जिल्हाध्यक्षा नैना भोईर, शाखा अध्यक्ष संदीप पंडित, गणेश लांडगे, महेश बनकर, रोहन पोवार, अभिजीत मालुंजकर, स्वाती कदम, चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पश्चिमेतील महापालिका मुख्यालयाशेजारीच असलेल्या सुभाष मैदानात अनेक नागरिक दैनंदिन उपक्रमानुसार सकाळच्या सत्रात फेरफटका मारायला येतात. परंतु तेथील फुटपाथवर गाड्यांची रेलचेल सुरू असते. मैदानाची लेवल नसल्यामुळे रोजच्या रोज पाणी मारले जात नसल्याने धुळीने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तसेच स्वच्छतागृहाची देखील बिकट अवस्था झालेली दिसून येते. त्याचबरोबर स्त्रियांसाठी चेंजिंग रूमची सोय सुद्धा नाही. येथे असणाऱ्या गटराचे पाणी फुटपाथवर येऊन दुर्गंधी पसरलेली असते.

मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी मुख्यालयात मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत या समस्यांचा पाढा वाचला. या ठिकाणावर योग्य ती कार्यवाही १५ दिवसांत न झाल्यास उपोषण व नागरिकांना सोबत घेऊन एक दिवसीय भिक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेने दिला. याबाबत केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी मैदानाची अवस्था खराब असल्याचे मान्य करत, मैदानाच्या दुरुस्तीसाठी खेलो इंडिया अंतर्गत याठिकाणी प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले.

रात्रीच्या वेळेस गर्दुल्ले, नशाबाज लोकांचा वावर

येथे असणाऱ्या पु.ल. कट्ट्याची देखील दयनीय अवस्था आहे. संध्याकाळच्या वेळीस मैदानात गर्दीमध्ये काहीजण अनधिकृतरीत्या व विनापरवानगी घोडेस्वारी करतात त्यामुळे अपघात होणे टाळू शकता येत नाही. रात्रीच्या वेळीस गर्दुल्ले नशाबाज लोकांचा वावर असतो. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडू शकते. मैदानाची निगा व साफसफाई राखण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मैदानाची नियमित देखभाल व साफसफाई होत नाही. अवैध पार्किंग व प्रत्यक्ष मैदानात दुचाकी व चारचाकी येण्या-जाण्यावर कुठलेही नियंत्रण नाही. या सर्व गोष्टींमुळे प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in