
खारमघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर आत्तापर्यंत तब्बल १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू शिंदे - फडणवीस सरकारने घडवून आणल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडियो शेअर करत ही टीका केली.
"झालेली गर्दी पाहून आपल्या डोळ्यांना बरे वाटेल म्हणून ही गर्दी करण्यात आली होती. त्यामध्ये हे मृत्यू झाले असून मृतांची संख्या जेवढी सांगितली जाते त्यापेक्षा अधिक आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मला एकाने एक व्हिडीओ पाठवला. जे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यावरून हे उष्माघाताचे बळी आहेत असे कुठेही वाटत नाही. चेंगराचेंगरीमध्ये जो जीव गुदमरतो, त्यामुळे हे मृत्यू झाले असावेत असा माझा अंदाज आहे. मी त्यामधला तज्ज्ञ नाही, पण ही चेंगराचेंगरीच दिसत आहे. तिथेच ४-५ लोक कोसळले असून त्या व्हिडीओत १ मुलगा आपल्या आईला पंपिंग करताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होती. जी काही परिस्थिती सांगितली जाते, तेवढी ती सहज सोपी नक्कीच नाही." असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.