

ठाणे : दिवा रेल्वे स्थानक परिसरात अर्थिंगचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (३७) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी असिस्टंट इंजिनिअर दीपक श्यामबहादूर पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार खंगाराम हरजीजी रावल हे मयताचे भाऊ असून ते देखील मुंबई परिसरात अर्थिंगचे काम करतात. सध्या ते वसई येथील तुंगार फाटा परिसरात भाड्याच्या खोलीत एकटे राहतात. २२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ९ वरील तिकीट काऊंटरबाहेरील भागात खड्डा खोदण्याचे अर्थिंगचे काम सुरू असताना खंगाराम यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. रेल्वे पोलिसांनी जखमी कामगाराला तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणात दीपक पांडे आणि राहुल पांचाळ यांनी मयतास कोणतेही सुरक्षितता उपकरण उपलब्ध करून न दिल्याने विजेचा धक्का बसून गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या हयगयी व निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.