

कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलण्यासाठी आग्रह धरल्यामुळे मानसिक तणावातून एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये ही घटना घडली.
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचं कुटुंब मूळचं झारखंडचं असून ते डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहे. तरुणाचे त्याच्या मूळ गावातील एका मुलीवर होते आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी कायदेशीररित्या मान्य २१ वय होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले होते. अखेर मानसिक तणावातून ३० नोव्हेंबर रोजी त्याने घरातच स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आई बाबा मला माफ करा; स्टेटस ठेवत मुरबाडच्या तरुणाची कल्याणच्या काळा तलावात आत्महत्या
अन्य एका घटनेत कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाचा काळा तलावात मृतदेह आढळला. हा तरुण शनिवारी रात्री घराबाहेर पडला होता आणि आपल्या आई वडिलांना उद्देशून, 'आई बाबा मला माफ करा' असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते. बराच वेळ होऊनही प्रदीप परतला नाही. त्याचवेळी त्याच्या मोठ्या भावाने व्हॉट्सअॅप स्टेटस बघितले आणि नंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. प्रदीप किसन भोईर (वय ३०) असं या तरुणाचं नाव आहे. तो दत्त मंदिराजवळील हरीओम सोसायटी परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. भोईर कुटुंब हे मुळचे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावचे रहिवासी आहेत. प्रदीपने आत्महत्या का केली याचा पोलिस तपास करत आहेत.