वाद घालू नका, नियमांचे पालन करा! रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलिसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

पालक व विद्यार्थ्यांनी डोक्यावर हेल्मेट घालून वाहतूक पोलिसांच्या समवेत शाळेपासून, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरपर्यंत बाईक रॅली काढली.
वाद घालू नका, नियमांचे पालन करा! रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलिसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

बदलापूर : वाहतुकीचे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवताना अडवल्यास वाहतूक पोलिसांशी वाद न घालता वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन अंबरनाथ वाहतूक पोलीस उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी केले.

३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत, बदलापुरातील कै. द्वा. ग. नाईक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी हे आवाहन केले. सध्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणे, फोन कानाला लावून संवाद साधत गाडी चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे या प्रमुख चार कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात टाळावे व नियम पाळावे यासाठी, वाहतूक विभागाच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान देशभर राबवले जात असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.

अनेक चालक वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यात कर्तव्यावर असताना वाहतूक पोलिसांनी अशी वाहने अडवल्यास वाहन चालक विविध कारणांवरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. परंतु हे नियम तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे आजगावकर म्हणाले. या कार्यक्रमात वाहतूक विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी डोक्यावर हेल्मेट घालून वाहतूक पोलिसांच्या समवेत शाळेपासून, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरपर्यंत बाईक रॅली काढली. दुचाकीस्वारांनी सक्तीने हेल्मेटचा वापर करून अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in