डोंबिवली पश्चिमेकडील कोपर खाडीत ड्रेझरच्या मदतीने रेती उपसा करण्याचे काम आजही जोमाने सुरू आहे. कोपर दिवा जोडणारा रेल्वे ट्रॅकपर्यत रेती उपसा केली जात असल्याने कोपर खाडीकिनाऱ्यापासून खोल खाडीपर्यंत हजारो टन रेती दररोज उपसली जात असल्याने आजूबाजूच्या शेतजमिनी नापीक झाल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे. रेतीमाफियावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पथक त्या ठिकाणी दाखल होत असत मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे तक्रार नसल्याचे सबब सांगत त्यावर पांघरूण घालण्यचे काम सुरू होते. प्रशासनाच्या हतबलतुमळे रेती उपसा करणार्यांची ताकद अधिक प्रमाणात वाढत आहे. तसेच तक्रार नसल्यामुळे पथकाने जप्त केलेले बाज आणि कर्मचार्यांना सोडून देण्यात येत असल्यचे प्रकार समोर आले आहे. अनेक वर्षापासून हा रेती उपसा सुरू असताना रेल्वे प्रशासनाकडून किंवा महसूल विभागाकडून आजवर कडक कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या भागात रेती उपसा सुरू असून यापूर्वी अनेकदा रेतीमाफियांना ताब्यात घेऊनही सोडून देण्याचे प्रकार सुरूच आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकासह तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी करत हा रेतीउपसा थांबविण्याची मागणी केली आहे. कोपर भागात रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी जात रेतीने भरलेले बाज ताब्यात घेत कर्मचार्यासह किनार्यावर आणले. मात्र यानंतर शेतकर्यांनी आपल्या ७/१२ सह त्यांचे किती नुकसान झाले याबाबत तक्रार करावी अशा सूचना देत तक्रारदार नसल्याचे सांगत पोलीस बाज आणि रेती उपसा करणाऱ्या कर्मचार्याना देखील किनाऱ्यावर सोडून निघून गेले.