धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कोणतीही ऑफर नव्हती; संजीव नाईक यांचा खुलासा

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अद्याप कायम असल्याने या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाही.
धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कोणतीही ऑफर नव्हती;  संजीव नाईक यांचा खुलासा

ठाणे : ठाणे लोकसभेसाठी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकाराची ऑफर आल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केला आहे. नाईक यांच्या या खुलाशामुळे ते धनुष्यबाण या चिन्हावर लढणार असल्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही, असे वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अद्याप कायम असल्याने या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजप कडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. नाईक यांच्या या 'ठाणे'वारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत.

नाईक यांनी ठाणे लोकसभा धनुष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा संजीव नाईक यांनी केले आहे. उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. आमची महायुती आहे. मला विश्वास आहे की येथील खासदार हा पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचे यावेळी नाईक म्हणाले.

वक्तव्याचा अर्थ काय?

संजीव नाईक यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाण्यात नाईक की सरनाईक या प्रश्नावरही त्यांनी वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार

आता आम्हाला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे.सध्या तो वाढवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष प्रयत्नशील असल्याचे नाईक म्हणाले. ठाणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार . मात्र तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत. कार्यकर्ते देखील समजूतदार असून एकजुटीने महायुतीमध्ये काम करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

‘योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ’

राजन विचारे यांनी उमेदवार नसेल तर बिनविरोध निवडून द्या असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना नाईक यांनी आत्ता ते उमेदवार आहेत त्यामुळे काही बोलणे योग्य नाही. मात्र योग्यवेळ येईल तेव्हा उत्तर देण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in