

उल्हासनगर : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांच्या हत्येला ४० दिवस उलटले असतानाही सर्व आरोपींना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ, त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर जोरदार मोर्चा काढला. पोलिसांच्या ढिसाळ तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उर्वरित आरोपींना तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
२२ ऑक्टोबरच्या रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासानुसार, ही हत्या एमआयडीसीतील प्लॉटच्या वादातून झाली. घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी काही सूरज पाटील आणि हर्ष पाटील या दोन आरोपींना अटक केली. मात्र इतर आरोपी अजूनही फरार असल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना आहे.
संजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. पाटील कुटुंबीयांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली आणि प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
“आरोपींना अजूनही अटक झालेली नाही, यामुळे आम्हाला न्याय मिळेल की नाही, अशी शंका वाटते आहे,” असे कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.