
ठाणे : विविध योजनांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले.
केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहचण्यासाठी मदत होणार आहे. ॲग्रिस्टॅक संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांनी दिली.
सर्व ग्रामपंचायतींमार्फत कॅम्प नियोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून देणार आहेत.
शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी प्राथमिक जबाबदारी पार पाडणार आहेत.
विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करून लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करून दिले आहे. यामुळे शेतजमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरूपात तत्काळ उपलब्ध होणार असून ॲग्रिस्टॅक ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
डिजिटल सेवा देणे मुख्य उद्देश
कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे.