
उन्हाळ्याच्या दिवसात तयार होणारा व प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा रानमेवा दुर्मीळ हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रानमेवा मिळविण्यासाठी फार मोठी धडपड करावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे जंगल संपत्तीच्या होणाऱ्या ऱ्हासाने उन्हाळ्यात जंगल भागात तयार होणारे काजू, फणस, करवंदे, जांभळे, आंबे आदी रानमेवा दुर्मीळ होऊ लागल्याचे समोर आले आहे.
वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे जंगलाची बेसुमार कत्तल केली जात आहे. दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणासह अनादी काळापासून मानवाने इंधन व घरगुती वापरासाठी जंगल संपत्तीची लूट चालविली आहे. त्यात भरीस भर म्हणून जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे दिवसागणिक जंगलांची संख्या कमी कमी होऊ लागली. त्याचे परिणाम जंगलसंपत्तीवर होऊ लागतर आहेत.
जंगलाच्या आश्रयाला असलेले व प्रत्यक्ष जंगलात राहणाऱ्या बहूतांश लोकांचा उदरनिर्वाह हा वनसंपत्तीवरच अवलंबून असल्याने जंगल संपत्तीच्या ऱ्हासाचे परिणाम त्यांनाही भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यात जंगल भागात तयार होणारे आंबे, काजू, फणस, करवंदे, जांभळे, फणस आदी रानमेवा मिळविण्यासाठी सद्य स्थितीत फार मोठी धडपड करावी लागत असल्याचे आदिवासी भगिनींकडून सांगण्यात येत आहे. तर सततची होणारी वृक्षतोड व जंगलात लावले जाणारे वणवे यांचाही परिणाम रानमेव्यावर होऊ लागल्याने पूर्वी पेक्षा रानमेवा मिळण्याचे प्रमाणही कमी झाले असून ते मिळविण्यासाठीच फार मोठी धडपड करावी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.