कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ करण्यात आला असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केली आहे. डोंबिवली गणेश मंदिर जयहिंद कॉलनी प्रभागातील सुमारे दिड ते पावणे दोन हजार मतदारांची नावे मोठा गावं ठाकुर्ली आनंदनगर नवागाव प्रभागात वर्ग केली आहेत. मुळात गणेश मंदिर प्रभागात राहणारे माजी नगरसेवक व त्याच्या कुटुंबियांची नावेही त्याच्या गणेशमंदिर प्रभागात नसून तीही दुसऱ्याच प्रभागात जोडली आहेत. प्रभागाचे नाव गणेश मंदिर मात्र मंदिराचा दुसऱ्या प्रभागात ही पद्धत कोणती असा सवालही धात्रक यांनी केला आहे. याबाबतीत जर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करणार असा इशारा धात्रक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्यामुळे प्रारूप प्रभाग मतदार याद्या पालिकेच्या निवडणूक विभागाने घोषित केल्या आहेत. प्रथमच त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक होणार आहे. तीन वार्डचा एक प्रभाग निर्माण करून तीन प्रभागातील मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 32 प्रभागातुन एकूण ३० ते ३५ हजार मतदार असलेला प्रभाग करण्यात आला होता. त्याप्रमाणे रचनेनुसार प्रभागातील प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी याच प्रारूप मतदार यादीबाबत आक्षेप घेतला आहे.
याबाबत धात्रक यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र ३२ गणेश मंदिर जयहिंद कॉलनी प्रभागातील तब्बल दिड ते पावणे दोन हजार मतदारांची नावे बाजूच्या प्रभाग क्र २९ मोठा गावं ठाकुर्ली आनंदनगर नवागाव या प्रभागात समाविष्ट केली आहेत. गणेश मंदिर प्रभागात राहणारे माजी नगरसेवक व त्याच्या कुटुंबियांची नावे चक्क बाजूच्या प्रभागात जोडली आहेत. मुख्य म्हणजे प्रभागाचे नाव गणेश मंदिर असून मंदिराची वास्तूच बाजूच्या प्रभागात असा प्रताप पालिकेच्या निवडणूक विभागाने केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाकडे या मतदार यादीबाबत माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी प्रारूप मतदार यादी बाबत हरकत घेतली आहे. गणेश मंदिर जयहिंद कॉलनी मधील भाग बाजूच्या ठाकुर्ली आनंदनगर नवागाव प्रभागात समाविष्ट केलेल्या मतदार याद्या पुन्हा गणेश मंदिर प्रभागात समाविष्ट केल्या नाहीत तर आमरण उपोषण करणार असा इशारा धात्रक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.