

उल्हासनगर : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, ऑपरेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या एका रुग्णाची मानसिक आणि शारीरिक फरफट होत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.
महिनाभर रुग्णालयात दाखल असलेल्या राजकुमार पासी या रुग्णाला चार वेळा शस्त्रक्रियेची तारीख देऊन दिवसभर उपाशी ठेवले. मात्र प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी ‘डॉक्टर उपलब्ध नाहीत’ किंवा ‘डॉक्टर सुट्टीवर आहेत’ अशी कारणे देत ऑपरेशन रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या सततच्या प्रकारामुळे त्याची प्रकृती खालावत असून मानसिक तणावातही मोठी वाढ झाली आहे. त्याच्याकडे जवळचे नातेवाईक नसल्यानेच त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागांतून गंभीर रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होतात. मात्र अनेक रुग्णांना थेट कळवा रुग्णालयात रेफर केले जात असल्याने मध्यवर्ती रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘हे रुग्णालय फक्त नावापुरते आहे का? असा सवाल केला जात आहे.