व्हिडिओ व्हायरल करा, मी सामोरे जाण्यास तयार; गणेश नाईक यांचे नरेश म्हस्के यांना आव्हान

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील वाद आता आणखी चिघळला असून, गणेश नाईक यांनी सोमवारी ठाण्यात शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना थेट आव्हान दिले. म्हस्के यांनी दोन दिवसांपूर्वी नाईक यांच्या 'नालायकपणाचे' व्हिडिओ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा इशारा दिला होता. त्यावर नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
व्हिडिओ व्हायरल करा, मी सामोरे जाण्यास तयार; गणेश नाईक यांचे नरेश म्हस्के यांना आव्हान
Published on

ठाणे : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील वाद आता आणखी चिघळला असून, गणेश नाईक यांनी सोमवारी ठाण्यात शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना थेट आव्हान दिले. म्हस्के यांनी दोन दिवसांपूर्वी नाईक यांच्या 'नालायकपणाचे' व्हिडीओ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा इशारा दिला होता. त्यावर नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित जनता दरबारात पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक म्हणाले, "मी १९९० साली आमदार झालो. आज २०२५ साल आहे. गेल्या ३५ वर्षांत असे किती लोक आले आणि गेले, त्यांची नावेही आठवत नाहीत. आजही मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्या गरजांइतके पैसे माझ्याकडे आहेत. मी अशी कोणतीही कामे करत नाही, ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयची छाप पडेल.

त्यांनी म्हस्के यांना थेट आव्हान देत म्हटले, 'माझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर करा, आता करा. मी सामोरे जाण्यास तयार आहे.' तसेच, 'माझ्या आयुष्यात जर मी चुका केल्या असतील तर त्याचे पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईन,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनातील त्रुटींवर बोलताना त्यांनी, 'प्रशासनात दहा टक्के लोक नालायक आहेत, याची प्रचिती नुकतीच काही अधिकारी पैसे घेताना पकडले गेले तेव्हा आली,' असे सांगितले.

'मी इथे कोणावर मेहेरबानी करायला आलो नाही. मी गरीब जनतेचे अश्रू पुसायला आलो आहे. माझे हात स्वच्छ आहेत आणि मनही स्वच्छ आहे,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

भ्रष्टाचारावर नाराजी

ठाणे मनपा लाचखोरी प्रकरणावरही नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. 'आज न्यायाधीशांच्या घरातही पैसे सापडतात, मग न्याय मागायचा कोणाकडे? हे लोकांचे दुर्दैव आहे,' असे ते म्हणाले. 'जर गणेश नाईक भ्रष्टाचारी असेल, तर माझ्यावरील प्रकरणे बाहेर काढा. जो आपले कर्तव्य पार पाडत नाही तो नालायकच आहे, मी काम करत नसेन तर मी सुद्धा नालायकच ठरू शकतो.'

‘जनता दरबार’ आणि नवी मुंबई विमानतळ

मला दरबार भरविण्याची काही हौस नाही, पण लोकांना दिलासा देणारे काम या दरबारातून होत आहे. जर येथे कोणी येणारच नसेल तर असा दरबार बंद करायला मला अजिबात वेळ लागणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल. या संदर्भात दोन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in