ग्लोबल सिटीच्या रहिवाशांची पाण्याची तहान अखेर भागली! आता टँकरवर अवलंबून राहावे लागणार नाही

गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा तुटवडा सहन करणाऱ्या ग्लोबल सिटीच्या रहिवाशांना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक आनंदवार्ता दिली.
ग्लोबल सिटीच्या रहिवाशांची पाण्याची तहान अखेर भागली! आता टँकरवर अवलंबून राहावे लागणार नाही

वसई : गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा तुटवडा सहन करणाऱ्या ग्लोबल सिटीच्या रहिवाशांना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक आनंदवार्ता दिली. ग्लोबल सिटीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून लवकरच मुख्य टाकीतून रहिवाशांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यामुळे आता या भागातील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार नाही. आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी सभापती प्रफुल्ल साने यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन झाले. अखेर आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत असलेल्या ग्लोबल सिटीमध्ये गेली अनेक वर्षे पाण्याचा तुटवडा होता. पालिकेकडून थेट पाणी येत नसल्याने येथील रहिवाशांना प्रामुख्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. उन्हाळ्यात तर या रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी बहुजन विकास आघाडीने पुढाकार घेत थेट पाणी पोहोचविण्याचे वचन दिले होते. बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा करत या भागासाठीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती.

या वेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सभेला संबोधित केले. तसेच ग्लोबल सिटी व एचडीआयएल येथील रहिवाशांनी उपस्थित केलेल्या असंख्य प्रश्नांना आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी उत्तरे देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

या वेळी युवा आमदार क्षितिज ठाकूर, माजी सभापती प्रफुल्ल साने आणि इतर माजी नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह शेकडो रहिवाशांच्या उपस्थितीत जलकुंभात पाणी सोडून तात्काळ आश्वासनाची पूर्ति करण्यात आली.

१८५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार

ही योजना मंजूर होऊन एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला १८५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यातूनच ग्लोबल सिटीची तहानही भागणार आहे. हे पाणी पालिकेच्या मुख्य टाकीत जमा झाले असून रविवारपासूनच त्याचे वितरण ग्लोबल सिटीमध्ये सुरू झाले. ही आनंदवार्ता रहिवाशांना देण्यासाठी बहुजन विकास आघाडीने ग्लोबल सिटीच्या क्लब-१ येथे रविवारी जाहीर सभा घेतली. या सभेसाठी आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी सभापती प्रफुल्ल साने हे देखील उपस्थित होते.

वसई-विरार येथे राहणारे लोक स्वत:च्या पसंतीने नाही, तर मुंबईत घर परवडत नाही या मजबुरीने इथे राहतात. त्यांना या शहराबद्दल जिव्हाळा वाटतोच असे नाही किंवा या शहराबद्दल प्रेम वाटते, म्हणून तुम्ही इथे राहायला आलेला नाहीत. पण या गोष्टीवर थोडा विचार करायला हवा. तुम्ही या शहराला आपलंसं करा, हे शहर तुमची स्वप्न पूर्ण करेल. या शहरावर प्रेम केलंत, तरच तुम्ही शहराची काळजी घ्याल.

- आ. हितेंद्र ठाकूर.अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in