
दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या दहीहंडी उत्सवात विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडुन 'स्पेन' वारी घडवण्याची घोषणा मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. नौपाड्यातील भगवती मैदानात १९ ऑगस्ट रोजी जल्लोषात होणाऱ्या या दहीहंडीत ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ११ लाखांचे सामुहिक बक्षिस तर एकुण ५५ लाखांची बक्षिसे जाहिर केली आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अपेक्षित असलेली मराठमोळी परंपरा जपुन यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवामध्ये कोकणातील चाकरमान्यांसह वनवासी बांधवदेखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
मागील वर्षी कोरोना काळात तत्कालीन सरकारने सण - उत्सवांवर लादलेली बंदी झुगारत ठाण्यात सर्वप्रथम मनसे उभी ठाकली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुंच्या सणांसाठी आग्रही भूमिका घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी गतवर्षी कोविड नियम पाळुन योग्य ती खबरदारी घेत विश्वविक्रमी दहीहंडीचा सण साजरा केला होता. तर यंदाही मनसेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.