अवकाळी पावसामुळे वीटभट्टींचे अतोनात नुकसान; रॉयल्टीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक संकटात

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील निडी येथील वाल खाण्यास अतिशय चविष्ट असल्याने मागणी वाढत आहे.
अवकाळी पावसामुळे वीटभट्टींचे अतोनात नुकसान; रॉयल्टीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक संकटात

अनिल पवार/नागोठणे : नागोठणे विभागात मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अधून-मधून अवकाळी पावसाच्या अचानक सरी आल्यामुळे सर्व सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची देखील तारांबळ उडाली. नागोठणे विभागात भाताच्या पिकांचे ज्याप्रमाणे नुकसान झाले. त्याप्रमाणेच वाल शेतीही धोक्यात आली असून, वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टीमध्ये वीटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागोठणे विभागातील विटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त वीटभट्टींचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यांतील काही तालुक्यांसह नागोठणे विभागात अचानक अधूनमधून वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामध्ये आंबा, काजू, वाल व इतर कडधान्य यांच्यासह वीट व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. वीटभट्टी व्यावसायिक हे, तर कच्ची वीट तयार करीत असताना पडलेल्या पावसाने विटांची पूर्णतः माती झाली असून, आधीच कोरोनोचे संकट, नंतर चक्रीवादळ, त्यात हा पडणारा अवकाळी पाऊस त्यामुळे रॉयल्टीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, डोक्यावर कर्ज घेऊन उभारलेला वीट व्यवसाय आज धोक्यात आला आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन या नुकसानग्रस्त वीट व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नुकसानभरपाई जाहीर करावी - निखिल मढवी

वीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले, तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत असल्याचे खंत वीटभट्टी मालकांनी व्यक्त केली आहे. तसेच रॉयल्टी भरून सुध्दा शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही. दरवर्षी अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागते. परंतु शासनाकडून कोणतीही मदत होत नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या वीटभट्टीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागोठणे विभाग चालकमालक वीटभट्टी संघटना नागोठणेचे अध्यक्ष निखील बाळाराम मढवी यांनी केली आहे.

निडीच्या वालाचे उत्पन्न घटण्याची शक्यता

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील निडी येथील वाल खाण्यास अतिशय चविष्ट असल्याने मागणी वाढत आहे. मात्र वातावरण बदलामुळे अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे निडी येथील वालाची शेती धोक्यात आली असून, त्यामुळे येथील वालाचे उत्पन्न घटण्याची शक्यता बळावली आहे. या अवकाळी पावसामुळे सध्या जे वालाचे पीक तयार झालेले होते, ते पूर्णपणे खराब होण्याची भीती शेतकरी वर्गांमध्ये पसरली आहे. जे काही वालाच्या पिकाला फूल पकडले होते ते पूर्णतः गळून पडले आहेत. यातून येथील वाल शेती करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना आतोनात नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in