ठाण्यात बुधवारी सायंकाळपासून विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्ह्यात अंधार पसरला. संध्याकाळी एका तासात ३२.५१ मिमी पावसाची नोंद पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील नितीन कंपनी, वंदना सिनेमा, पाचपाखाडी, तसेच पालिका मुख्यालय परिसर या ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले.
अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तासाभराने पावसाचा जोर ओसरला. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील वातावरणात थंडावा पसरलेला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.