इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता

इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल २८ वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना  दिलासा मिळण्याची शक्यता
Published on

ठाणे: इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल २८ वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झाला असून अनेक नागरिकांनी तक्रारींची निवदने सादर केली. उपक्रमात इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना श्री.केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली.

केळकर म्हणाले, गेली २८ वर्षे कामगारांना त्यांची देणी मिळाली नाहीत. कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. न्यायालयात दावा हरले असले तरी या कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावीत यासाठी कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्याने ठामपा आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली.

उपक्रमात ठाणे, बदलापूर, भिवंडी आदी भागांतून नागरिक उपस्थित होते. सर्वाधिक तक्रारी या आर्थिक फसवणुकीच्या प्राप्त झाल्या. आर्थिक गुन्हे शाखेची दिरंगाई, कमी मनुष्यबळ यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे अशा तक्रारींची प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे या विभागाला मनुष्यबळ वाढवून मिळावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.

उपक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेवक वैभव कदम, नगरसेविका उषा वाघ यांच्यासह योगेश भंडारी, राजेश गाडे, शेखर पाटील, गौरव सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पदांसाठी नाही, ठाणेकरांच्या हितासाठी लढू-आ.केळकर

आमदार संजय केळकर म्हणाले, भाजप आणि शिवसेना निवडणुकीत महायुती म्हणून लढले, त्यामुळे एकत्रच राहू. पक्षाच्या वाट्याला पदे यावीत यासाठी तर आम्ही मुळीच संघर्ष करणार नाही पण पारदर्शक शहर विकास, नागरिकांच्या हिताच्या योजना, त्यांच्या गरजा याबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, प्रसंगी संघर्षही करू, अंकुश ठेवण्याचे कामही करू. २०१७ मध्ये आम्ही विरोधी बाकावरच बसलो होतो, त्यामुळे आम्ही नागरिकांच्या हितासाठी वेळ पडली तर यावेळीही विरोधी बाकावरही बसू, याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in