

ठाणे: इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांवर जाणवू लागले आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने पोळी-भाजी केंद्रांवर भाजी, भाकरी आणि चपातीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. पोळी-भाजी केंद्रांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी हॉटेल-पोळी-भाजी केंद्रांवर व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, भाजीपाल्याचे वाढते दर, खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे पोळी-भाजी केंद्रासह ग्राहकांनाही जबर फटका सहन करावा लागत आहे.
पोळी- भाजी केंद्रात चपाती ७ रुपयांपासून १० रुपये, भाकरी २० रुपयांवरून २५ रुपये, १०० ग्रॅम भाजी ४० रुपयांपासून ६० ते ७० रुपये, रस्साभाजी ५० ते ६० रुपयांवर दर गेले आहेत. दिवसभर काम केलेला कामगार दुपारी पोळी-भाजी केंद्रात अथवा खाणावळीत जेवायला जातो तेव्हा ८० ते १०० रुपयांची थाळी १२० ते १५० रुपयांवर गेल्याचे समजल्याने त्यांच्या खिशाला चाट पडत आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई वाढत आहे. त्यातच आखाती देशांतील युद्धाचा थेट परिणाम गृहिणींच्या स्वयंपाकाला आणि पोळीभाजी व्यावसायिकांना भोगावे लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पोळी -भाजी केंद्रांवर वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम फुटत आहे.