भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे काँग्रेसमधून नाराजी

भिवंडी लोकसभा क्षेत्राची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठीला याबाबत जाब विचारून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुक २०२४ बाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भिवंडी लोकसभा कार्यकारीणीने प्रतिक्रिया देताना सूचकपणे सांगितले आहे.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जागा वाटपाच्या
तिढ्यामुळे काँग्रेसमधून नाराजी

भिवंडी : लोकसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून, जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सर्वत्रच संभ्रम निर्माण झाले आहे.त्यातच भिवंडी लोकसभा क्षेत्राची इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी - काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे उघड होत आहे.

विशेषतः या जागेवर काँग्रेस पारंपरिक रित्या दावा ठोकत असून, राष्ट्रवादीला जागा देण्याच्या वृत्तामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पारंपरिकपणे भिवंडी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या जागेसाठी दावा ठोकला आहे. यासह भिवंडी लोकसभा क्षेत्राची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठीला याबाबत जाब विचारून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुक २०२४ बाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भिवंडी लोकसभा कार्यकारीणीने प्रतिक्रिया देताना सूचकपणे सांगितले आहे.

तसेच भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी सांगितले की,ही उमेदवारी राष्ट्रवादीला गेल्यास कोकणातून काँग्रेस संपवण्याचा हा कट रचला जात आहे. तर २०१४ साली मिळालेल्या पराजयाचा बदला घेण्याची ही संधी २०२४ मध्ये आल्याने या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या जागेसाठी इंडिया आघाडीतून काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याने काँग्रेस आपल्या भूमिकेवर किती ठाम राहते,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in