कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर फिरणार बुलडोझर; डीपी प्लान रद्द करण्याची जितेंद्र आव्हाड यांची मागणी

घरे विकत घेणे परवडत नसल्यामुळे ठाणे, मुंबईमधील मराठी माणूस हा बाहेर फेकला जात असल्याने मराठी माणसाला पुन्हा ठाणे, मुंबईत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड
डॉ. जितेंद्र आव्हाडसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : घरे विकत घेणे परवडत नसल्यामुळे ठाणे, मुंबईमधील मराठी माणूस हा बाहेर फेकला जात असल्याने मराठी माणसाला पुन्हा ठाणे, मुंबईत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला असून डीपीमधील नियोजित रस्त्यामुळे कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा डीपी प्लान रद्द करण्याची मागणी केली असून सर्व रहिवासांसोबत याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा नवीन विकास आराखडा ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उद्ध्वस्त करणारा असल्याचे समजताच हा विकास आराखडा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, एनएम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांना विरोध केला. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली.

महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा, खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आ. आव्हाड यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मराठी माणूस अस्तित्व टिकवून आहे. या सर्व सोसायटी अधिकृत असून मूठभर बिल्डारासाठी कळवा उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला. तसेच नवीन विकास आराखडा बनवताना कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्यात आलेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हा विकास आराखडा बनवला असल्याचा आरोप आव्हाड यांनी रविवारी केला.

सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे

कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची जागेवर कब्जा करण्यात आला असून त्या ठिकाणी बेकायदा व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळा तोडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून बेकायदा व्यायामशाळा तोडण्यात येत नाही. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे. एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करू नये, असा सल्ला आव्हाड यांनी दिला.

ठाणेकरांना गृहीत धरू नका

ठाण्यात एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही. क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू झाली असून काही लोकप्रतिनिधी क्लस्टरच्या योजनेचे आम्हीच दाखवून नागरिकांना फसवत आहेत. आमच्या नातवाच्या नातवाला घर मिळणार असेल तर त्या योजनेचा फायदा काय असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत समजून सांगत नाही तो पर्यंत आमचा विरोध आहे. त्यामुळे ठाणेकरांना गृहीत धरू नका, असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला.

logo
marathi.freepressjournal.in