ठाणे : प्रभाग रचना सुनावणीच्या वेळेला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड भलतेच आक्रमक झाले. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकता हे तत्त्व डावलण्यात आले आहेत. ही प्रभाग रचना व्होट चोरीपेक्षा भंयकर असून नगरसेवक चोरी करण्यासाठी करण्यात आलेली ही प्रभाग रचना असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर चुकीच्या पध्दतीने वॉर्ड फोडून सोयीचे वॉर्ड तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला.
ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थितीत राहत आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले.
प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिध्द करण्यात आला. त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मुलभूत माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचाराणा करुनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवला.
एकूण नगरसेवक पद संख्येनुसार प्रती नगरसेवक लोकसंख्या ठरविली जाते. सामान्यत: चार नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास तीन किंवा पाच नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्यच्या १०% जास्तपर्यंत किंवा १०% कमीपर्यंत इतकी लोकसंख्या कमी जास्त करता येते.
प्रभाग रचना ही अधिकाऱ्यांनी हॉटलमध्ये बसून केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोलशेतमध्ये वरचा गाव खालचा गाव वेगळा केला गेला आहे, कोळीवाडा, कोकणीपाडा, वृदांवन तलावपाळीला आणि तलावपाळी खोपटला जोडण्यात आला आहे. आदींसह इतर भागांचे देखील अशाच पध्दतीने तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या तक्रारी कोणत्या प्रभाग समितीमध्ये जाऊन सोडवाव्यात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
’कळवा, मुंब्रा क्षेत्रात संपूर्ण प्रभाग चोरला’
ठाणे महानगरपालिकेची प्रती ४ सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या ५६,२२८ आणि प्रती तीन सदस्य सरासरी लोकसंख्या ४२.१७१ इतकी आहे. १०% जास्त व १०% कमी असा एकूण २०% लोकसंख्या फरकाचा गैरफायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यांत आले आणि कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आहे.
सोयीचे वॉर्ड तयार केले - काँग्रेस
महापालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेच्या नकाशांमध्ये हद्द दिसत नाही, सिमा चुकविण्यात आल्या आहेत. चुकीच्या पध्दतीने वॉर्ड फोडले गेले आहेत. सोयीचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. असा आरोप यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी सभागृहाबाहेर...
नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी सुरु असतांना ज्यांना वेळ देण्यात आल्या होत्या ते सभागृहाच्या बाहेर होते, त्यात सत्ताधारी भाजपचे काही मंडळी देखील बाहेर उभे होते. मात्र विरोधक थेट सभागृहात गेल्याने सत्ताधारी भाजपने आक्षेप घेत आम्ही तासनसात येथे थांबलो असतांना व्हिआयपींची आधी सुनावणी कशी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संपूर्ण शहराचीच वाट लावली- मनसे
केवळ एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराचीच वाट लावली आहे, असा आरोप करत एका प्रभागाचा विचार करून नका, प्रभागातून बाहेर पडा आणि संपूर्ण शहराचा विचार करा, असे आवाहन मनसेने यावेळी उपस्थितांना केले. पुढील तारखेला पुन्हा सुनावणी घ्यावी, आम्हाला योग्य संधी द्यावी” अशी मागणी त्यांनी केली.